मंगलवार, 28 जुलाई 2015

विद्यार्थ्यांचे कलाम सर- अमर रहे!



                 "काय.?" ऎसे शब्द माझ्या मुखातून बाहेर पडले आणि स्तब्धता पसरली शरीरात. मी रोजच्या प्रमाणे संध्याकाळी कबड्डीचे सामने बघत होतो लैपटॉप वर तेवढ्यात व्हाट्सअप वर बहिनीचा मेसेज आला "अरे 07.45 ला बातमी आली डॉ पी जे अब्दुल कलाम गेले" आणि मी बस तेवढेच बोलू शकलो. ताबडतोब कबड्डी बंद करून बातम्या सर्फिंग केल्या तर बातमी खरी होती आणि दुःखद वातावरण गडद झाले. मग लागोपाठ व्हाट्सअप वर मेसेज ची संख्या वाढायला लागली आणि सर्व तीच दुःखद बातमी सांगत होते बघता बघता माझ्याप्रमाने संपूर्ण भारत दुखाच्या सागरात बुडाला. आपले महामहिम राष्ट्रपति प्रणव मुखर्जी यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या सह अनेक गणमान्य आणि सर्वसामान्य व्यक्तिंनी सुध्दा लागोपाठ ट्वीट करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आजच्या वर्तमानपत्रांचे पाने डॉ कलाम यांच्या माहितीने भरलेले होते. सोशल नेटवर्किंग साइट्स वर तरुणांनी आपापल्या रीतीने श्रध्दांजली अर्पण केली. ऍफ़ एम् रेडियो च्या प्रत्तेक चॅनेल वर फ़क्त "कलाम सर सलाम" अशा आशयाच्या टैगलाइन प्रक्षेपित होत होत्या. ऎसे वाटत होते की आपल्या नात्यातील अतिशय जीवलग ऐसा वडीलधारी व्यक्ति मृत पावली आहेसाऱ्या भारत भरातील लोकांना एका बातमीने दुखावेगाने ग्रासले असे काय भावनिक नाते सामान्य जणांशी डॉ कलाम यांचे होते.?
                मी एकदम 12-13 वर्ष जुन्या स्मृतिमधे गेलो. तेव्हा नुकतेच दहावी पास होऊन मी 11 वीला प्रवेश केला होता आणि तारुण्याच्या पायरिवर पाऊल ठेवले होते. टीनएज मधे प्रत्तेक तरुणाचा एक आयडॉल असतो जो जिवंतपणी त्यांच्या मनावर अधिराज्य करत असतो. मग बऱ्याचदा तरुणांच्या आयडॉल च्या यादीत सिने नट-नटया , क्रीडापटु, गायक गायिका यांचा भरणा जास्त असतो. तसे लहान पना पासून छत्रपति शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद माझे आदर्श पुरुष आहेत पण ज्याला आमच्या पिढीने जगताना बघितले आहे असा कोणी आदर्श पुरुष किंवा आयडॉल नव्हता. अशा वयामधे एक दिवशी तत्कालीन जिल्हा प्रचारक विजयजी टोंचर यांनी "अग्नि की उड़ान" हे पुस्तक हातात ठेवले आणि म्हटल की "वाच, आपल्या नवनियुक्त राष्ट्रपति डॉ . पी. जे. अब्दुल कलाम यांच आत्मचरित्र आहे. आणि याच सोबत विज़न 2020 सुध्दा वाच" मी पुस्तक घेतले आणि वाचून काढले. आणि त्यानंतर एकच अधिराज्य मनावर सुरु झाले ते म्हणजे ' डॉ. अबुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम' यांच, अर्थात 'कलाम सर' यांच.
                         
                    पण हे फ़क्त माझ्या एकट्याच्याच बाबतीत नव्हते घडले.  माझ्या वयाच्या आणि लहान असणाऱ्या असंख्य बाल-तरुण विद्यार्थ्यांना जीता जागता आयडॉल मिळून गेला होता. ज्याला विचाराव त्याच एकच उत्तर 'माझे आदर्श डॉ पी जे कलाम'. आणि त्यांची ही क्रेज वर्षानुवर्षे तशीच अबाधित आहे, नव्हे उत्तरोत्तर वाढत गेली आहे. मी तरुण विद्यार्थी म्हणून असतांना आमच्यावर पगडा होता तसाच पगडा मी शिक्षक म्हणून तरुण विद्यार्थ्यांना शिकवायला लागलो तेव्हा त्या तरुण विद्यार्थ्यांवर सुध्दा तेवढयाच प्रमाणात आहे. मला आठवते मी एका अन्य पॉलीटेक्निक ला परीक्षक म्हणून तोंडी परीक्षा घ्यायला गेलो तेव्हा माझ्या निरीक्षणात आले की तेथील बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या फ़ाइल मधे आदर्श व्यक्ति म्हणून डॉ कलाम यांच छायाचित्र आणि माहिती होती.

                      डॉ कलाम यांनी भारताच्या विकासात जे मोलाचे योगदान केले त्यात संशोधक म्हणून त्यांनी डी आर डी   आणि इसरो मधे केलेल्या कार्याला इतिहासात सुवर्णाक्षराच स्थान प्राप्त असेल. वैमानिक बनून विमान उड़वत आकाशाला गवसनी घालायचे स्वप्न रंगवनारा एक तरुण आन्तर खंडाला भेदुन शत्रूच्या उरात धड़की भरवनारा अग्निबाण (मिसाइल) प्रक्षेपित करून साऱ्या विश्वाला अप्रत्यक्षपने सुनावणी करतो की "भारतमाता आता अधिक शक्तिसंपन्न झाली आहे. खबरदार वाकड़ी नजर टाकाल तर.!" त्यांच्या नेतृत्वात विकसित झालेल्या अग्नि, नाग, त्रिशूल, पृथ्वी आदि अग्निबाणामुळे आज आपण अनवस्त्रधारि देशांच्या पंगतीला मानाने बसतो. आणि म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटलजी यांनी त्यांना आपले मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्त केले होते.

                  
                         अतिशय मृदु स्वभावाच्या पण कणखर मनाच्या या व्यक्तीने देशाचे सर्वोच्च पद भूषवावे म्हणून अटलजी आणि त्यांच्या सरकारने राष्ट्रपति पदासाठी त्यांना पुढे केले आणि डॉ कलाम यांनी भारताचे 11 वे राष्ट्रपति म्हणून सूत्रे हाती घेतली. राष्ट्रपति म्हणून सुध्दा त्यांनी भारतीय जनतेच्या मनावर एक अमिट छाप सोडली. राष्ट्रपति म्हणून त्यांनी या देशातील जनते सोबत जास्तीत जास्त संवाद साधला. विशेषता विद्यार्थ्यांशी त्यांचे सख्य सर्वश्रुत आहे. विद्यार्थ्यांशी निगडित अनेक कार्यक्रमतील त्यांचा उत्साहवर्धक सहभाग सर्व भारतियानी अनुभवला आहे. त्यांची सारी भिस्त नवीन युवा पिढीवर होती. ज्याप्रमाणे विवेकानंदानी "मला 100 तरुण दया मी भारत बदलून दाखवतो" ऐसा विश्वास दाखवत युवा पिढीला जागृत केले होते तसेच "तंत्रज्ञानाने समृद्ध भारतातील तरुणा लहान लक्ष्य ठेवणे पाप आहे" ऎसे आवाहन करणारे डॉ कलाम आम्हा तरुणांच्या गळ्यातील ताईत बनतील यात काही शंका नाही. "देशाला देण्यासाठी दहा मिनिट वेळ आहेत काय" या त्यांच्या पत्रातून राष्ट्रनिर्माणात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे अशी साद त्यांनी घातली होती. आम्ही इंजीनियरिंग ला असताना आमच्या ग्लैडिएटर ग्रुप च्या माध्यमातून आम्ही त्याच्या प्रति प्रसारित केल्या होत्या 

               कदाचित मनाच्या कोपरयातील एक शिक्षक त्यांना विद्यार्थ्यांवर एवढे प्रेम करायला भाग पाड़त असावा. आणि म्हणून राष्ट्रपति व्हायच्या आधी जेव्हा ते अटलजिंचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार होते तेव्हा त्यांनी अटलजी पाशी आपली अध्यापनाची इच्छा प्रगट केली होती आणि या जबाबदारीतुन मुक्त करून अध्यापन कार्यासाठी वेळ देऊ करण्याची विनंती त्यांनी केली होती. राष्ट्रपति म्हणून कार्यकाळ सम्पल्यानंतर ते पुन्हा अध्यापन कार्याकडे वळले आणि अधिक जोमाने आपल्या अनुभवांना नवीन पिढितील विद्यार्थ्यांसोबत वाटू लागले. बाल आणि तरुनांशी ते इतक्या सहजतेने वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत की इतका मोठा व्यक्ति बोलतो आहे याचा विसर समोरच्याला पड़त होता. या संबंधी एक किस्सा 'सुधा मूर्ती' यांनी आपल्या एका पुस्तकात नमूद केला आहे की त्यांचा मुलगा रोहन सोबत ते इतक्या सहजतेने तासनतास गप्पा मारत बसले होते. विद्यार्थ्यांविषयी त्यांची बांधीलकी इतकी उत्कट होती की आयुष्याच्या अखेरीचा श्वास सुध्दा त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमासाठी वेचला. त्यांच्या जिवंतपणीच संयुक्त राष्ट्र संघाने त्यांचा जन्मदिवस 15 ऑक्टो हा जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करुन त्यांचा सन्मान केला.


                     भारताबद्दल अतीव प्रेम त्यांच्या मनात होते. त्यांच्या प्रत्तेक पुस्तकात विकसित भारताचे स्वप्न दिसून पड़ते. त्या साठी काय करता येणार यासम्बन्धीचे विवेचन त्यांच्या लेखांमधून विस्तृत आहे. 'विंग्स ऑफ़ फायर', 'विज़न 2020' 'इग्नाइटेड माइंड्स' आदि भारत भक्तिने ओतप्रोत पुस्तक असोत की 'फ्लूइड मैकेनिक्स एंड स्पेस टेक्नोलॉजी' हे अभियांत्रिकीच पुस्तक असो वा 'गाइडिंग सोल्स' सारखे आध्यात्मिक वळण असणारे पुस्तक असो, डॉ कलाम यांची राष्ट्रभक्ति पदोपदि दिसून येते. फ़क्त गद्यात्मक रचनाच् नव्हे तर पद्यात्मक रचना सुध्दा डॉ कलाम यांनी केल्या आहेत. ' ग्राम विकास' ' सैनिकांचा मान' अशा अनेक विषयाना स्पर्श करणाऱ्या डॉ कलाम यांच्या कविता आणि गीत खरोखर एका संवेदनशील व्यक्तिमत्वाचा परिचय करून देतात. युवकांना जागृत करणारी 'युथ सांग' ही कविता म्हणजे "उठा जागे व्हा आणि लक्षप्राप्तिशीवाय थांबू नका" या विवेकानंदांच्या पंक्तींचे अत्याधुनिक रूपच. दोन दिवसांनी गुरु पौर्णिमा आहे , भारतातील महान गुरु परंपरे बद्दल कृतज्ञता, आदर व्यक्त करणारी 'गुरु प्रकाशम' ही त्यांची रचना वाचली की आपल्याला अभिमान वाटतो आपल्या गुरुपरंपरेचा.



                 अतिशय हलाखीच्या परिस्थितीत लहानाचे मोठे झालेले डॉ कलाम शेवटपर्यन्त "साधी राहणी उच्च विचारसरणी" या तत्वाला अनुसरुणच वागले. राष्ट्रपति असताना सुध्दा आपल्या गरजा नियंत्रित ठेवणारे आणि कोणताही मोठा बड़ेजाव ठेवणारे डॉ कलाम एखाद्या विरक्त योगीपुरुषा सारखे जगले. वित्त मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी त्यांना श्रधांजलि अर्पण करताना जे ट्वीट केले "एक साधुवृत्तिचा संशोधक", ते बिलकुल चपखलपणे लागू पडणारे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे डॉ कलाम.



                  मुळात डॉ कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे आहेत. वैमानिक होण्याच स्वप्न भंगल्यानंतर हताश होता नियतीने जे पुढयात ठेवले त्यालाच जीवन ध्येय मानून त्या साठी सर्वस्व अर्पण करण्याची खंबीर प्रवृत्ति. ज्या बहिनीने आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या तिचे ऋण कायम स्मरणात ठेवणारा कृतज्ञ वृत्ति. आत्मसंरक्षण करण्यासाठी क्षेपणास्त्रे विकसित करताना दाखवलेली विजिगीषा. संरक्षणासाठी विकसित केलेला 'कार्बन कार्बन' हा हलका धातु अपंगांच्या पायांना गति देण्यासाठी केलेली प्रयोगशीलतेतुन झळकणारा सकारात्मक मानवी दृष्टीकोन. नित्यनेमाने नमाज पढ़नारे आस्तिक आणि संगीत, साहित्याच्या माध्यमातून सरस्वतीची उपासना करणारे आध्यात्मिक व्यक्तिमत्व. अतिशय। निरागस हास्य, निरलस स्वभाव, यामुळे वागण्यागिल सहजता. अद्वितीय बुद्धि कौशल्य, चिकाटीची संशोधक वृत्ति, नसानसात भिनलेली देशभक्ति, श्वास अन् श्वास समाजासाठी खर्ची घालण्याची समर्पण वृत्ति या अनेकानेक सदगुणांनी विभूषित व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ . पी. जे. अब्दुल कलाम. त्याच 2020 मधील विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी आपण सर्व भारतीय देशाला शक्तिसंपन्न, विश्वगुरु बनवण्यासाठी सर्वस्व पणाला लावू आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करू हीच त्यांना समर्पक श्रद्धांजली ठरेल. आषाढ़ी एकादशी ला वैकुंठाचे दरवाजे उघडे असतात आणि पुण्यात्म्यांना त्या दिवशी सदगति प्राप्त होते अशी एक प्रचलित धारणा आपल्या समाजात आहे. डाँ कलाम हे एक उच्च कोटीचे पुण्यात्मा आहेत. एका पुण्यात्म्याच्या मृत्युने सारे जग हळहळले. तिरंग्यात लपेटलेल्या त्यांच्या पार्थिवाला तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि सैनिक मानवंदना देत होते तेव्हा निश्चितच भारत मातेच्या आक्रोषाचे हुंदके त्यात सामावले गेले असतील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शान्ति प्रदान करो हीच प्रभुचरणी प्रार्थना.
           
               डॉ कलाम सर- अमर रहे! अमर रहे!
               विद्यार्थ्यांचे कलाम सर- अमर रहे!


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें